संगमनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला दोन महिने उलटूनही संबंधित आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या गंभीर प्रकरणात विशेष लक्ष घालून आरोपीस तातडीने अटक करावी आणि पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे केली.
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत डॉ.जयश्री थोरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत तसेच संगमनेर तालुक्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दीप चव्हाण, किरण पाटील, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, रामहरी कातोरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेला दोन महिने उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या प्रकरणाच्या तपासाला गती देऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा आणि पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचीही भेट घेतली. या भेटीत विविध सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा करण्यात आली.










