बारस्कर कुटुंबातर्फे पुष्पवृष्टी, मातापित्यांची सेवा ही सुद्धा पांडुरंगाची सेवा ः रामगिरी महाराज
अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र सरला बेट येथील संत श्री गंगागिरी महाराज वारकरी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे अहिल्यानगर शहरात आगमन होताच स्वर्गीय बाबासाहेब बारस्कर कुटुंबीयांच्या वतीने दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, संत माउली, तुकाराम आणि विठुरायाच्या नामस्मरणात तसेच पुष्पवृष्टी करत दिंडीचे स्वागत करण्यात आले. सावेडी परिसरात रंगलेल्या भव्य रिंगण सोहळ्याने आणि अश्वमेधाच्या आकर्षक सादरीकरणाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यावेळी हभप रामगिरी महाराज यांचे बारस्कर कुटुंबीयांच्या वतीने आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, बाळासाहेब बारस्कर, मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपालीताई बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, सचिन बारस्कर, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, आकाश कातोरे, नगरसेविका शारदाताई ढवण, योगेश ठुबे, संजय ढोणे, दत्ता तापकिरे आदींनी स्वागत केले.प्रवचनात रामगिरी महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदायाने समाजाला एकत्र ठेवण्याचे आणि समतेचा संदेश देण्याचे महान कार्य केले आहे. वारकरी अखंड भगवंताच्या नामाचा गजर करीत असतात. ज्ञानी-अज्ञानी, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न करता सर्वांना स्वीकारणारा देव म्हणजे पांडुरंग होय. भक्तांची वाट पाहणारा देव म्हणजे विठ्ठल. जो जो आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडतो, त्याच्याकडे देव स्वतः येतो, असे सांगत त्यांनी कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, माता-पित्याची सेवा हीदेखील पांडुरंगाची सेवा आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. संतांची ही विचारधारा पुढे नेण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने वारीत सहभागी होणे गरजेचे आहे. मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपालीताई बारस्कर म्हणाल्या की, आमचे सासरे स्वगय बाबासाहेब बारस्कर यांनी 36 वर्षांपूव श्री क्षेत्र सरला बेट वारकरी पायी पालखी सोहळ्याचे स्वागत करून महाप्रसाद सेवेचा उपक्रम सुरू केला होता. तीच सेवा परंपरा आज बारस्कर कुटुंबीय अखंडपणे पुढे चालवत आहेत.
अपघातग्रस्त वारकऱ्यांना श्रद्धांजली;
भेसळखोरांवरील कारवाईचे स्वागत
यावेळी रामगिरी महाराज यांनी अलीकडील अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला. वारकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने वारी करावी, स्वतःच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी घ्यावी तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पद असून राज्यात अशा धाडसी अधिकाऱ्यांची गरज आहे. तसेच राम मंदिर चोरी प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त करत मंदिरात चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व कडक शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. या विषयात राजकारण करण्याची गरज नसल्याचे सांगत आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी कार्याचेही त्यांनी कौतुक केले.










