अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्य शासनाने अधिकृतपणे औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तसेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे घोषित केले असतानाही महामार्गावरील व सार्वजनिक ठिकाणांवरील दिशादर्शक फलकांवर अद्याप जुनी नावेच कायम असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्याचा आरोप करत, आठ दिवसांच्या आत सर्व फलकांवरील नावे अद्ययावत करून छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर अशी नोंद करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देत महामार्गावरील दिशादर्शक फलकांवरील जुनी नावे तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यू. ए. बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे शासन आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
शासन निर्णयानुसार सर्व शासकीय फलक, दिशादर्शक बोर्ड व सार्वजनिक ठिकाणांवर अधिकृत नवीन नावे वापरणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अद्याप औरंगाबाद व अहमदनगर ही जुनी नावे कायम दिसून येत आहेत, ही गंभीर बाब आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष दीपक खेडकर, कार्याध्यक्ष नितीन घोडके, शहर संघटक राजेश भालेराव, सूरज शिंदे, ऋषिकेश रासकर, संकेत कराड, गणेश भालसिंग, सक्षम जाधव, अभिजीत खरात, कृष्णा शेळके, ओंकार जाधव, सार्थक लोहार, शिवाजी शिंदे, निलेश रासकर, सनी टेकाडे, सार्थक तागड, आशिष भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते. आठ दिवसांच्या आत सर्व फलकांवरील नावे बदलण्यात आली नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने दिला आहे.










