जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची उपस्थिती
निघोज / प्रतिनिधी
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव बुधवार दि.१ एप्रिल रोजी सुरू झाला असून दुपारी पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेकडो महिलांनी मळगंगा मंदीरात गर्दी करुण हळद लावण्याचा आनंद घेतला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई पाटील यांच्या सहीत महिला भगीनी तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी मंदीर ते देवीची हेमांडपंथी बारवेपर्यंत हळदीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
मळगंगा देवीच्या जयजयकाराने आसमंत दणाणून गेला होता. वाजत गाजत काढलेल्या या मिरवणुकीत महिला भगीनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर देवी मंदीरात आल्यानंतर महिला भावीकांनी देवीला हळद लावून दिले देवीप्रती भक्तीचा महिमा सादर केला. देवीच्या जयजयकाराच्या घोषनांबरोबर देवीगीतेही सादर करण्यात आली. मळगंगा देवीचे गीते म्हणण्यासाठी महिला भावीकांची स्पर्धा होत होती. यावेळी निघोज परिसरात भक्तिमय वातावरणात तयार झाले होते. त्यातच झिमझीम पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारी पाच ते सात या वेळेत काठीची मिरवणूक काढण्यात येणार असून ही काठी 85 फूट उंचीची असल्याने देवीची हेमांडपंथी बारव ते मळगंगा मंदीरापर्यंत ही काठी नेण्यासाठी भक्त भावीकांना मोठे परिश्रम घ्यावे लागत असले तरी देवीचा साक्षात्कार व देवीचा आशीर्वादाने या काठीची सवाद्य मिरवणूक दोन तासात मंदीरापर्यंत जाते. भंडाऱ्याची मुक्त उधळण, वाजत गाजत,भावीक या मिरवणुकीचा आनंद घेतात. काठी उभी राहील्यानंतर ते देवीच्या श्रींची म्हणजे घागर मिरवणूक तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) यात्रा सुरू झाल्यानंतर मासांहार जेवणावळी सुरु होतात. तोपर्यंत 10 दिवस पशूहत्या बंद असते. या दहा ते पंधरा दिवसांत देवीला नैवेद्य म्हणून घरोघर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. घरोघर सवाष्णी घालीत जवळपासच्या सात महिला भगीणींना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून बोलावले जाते. अशाप्रकारे हा यात्रा उत्सव आजपासून सुरू झाला आहे.

देवीला हळद लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील या निघोज येथे आवर्जून आल्या होत्या. विखे ताई या गेली अनेक वर्षात बऱ्याच वेळी त्या हळदीच्या उस्तवात आवर्जून सहभागी होत असतात. विखे ताई यावेळी म्हणाल्या मळगंगा देवी हे राज्यातील जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी माता म्हणून देवीचा राज्यात नावलौकिक असून आपण देवीचे भक्त असून आपण हळदी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घेत असून देवीच्या आशीर्वादाने अहिल्यानगर जिल्ह्यात सुख समृद्धी शांती व समाधान असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.










