मुंबई / नगर सह्याद्री –
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाऊ शकतो. निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश होता. या आंदोलनाचा दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. हा निकाल लांबणीवर जाऊ शकतो.
बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परिक्षांचे निकाल लावण्याचं काम संध्या बंद आहे. शिक्षण मंडळाची बढती आणि बदली दोन वर्षांवरुन चार ते सहा वर्षांवर नेल्याने कर्मचारी संतप्त झाले आहे.त्यामुळे २८ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोध दर्शवण्यात आला आहे. सध्या कर्मचाऱ्यांकडून राज्यातील नऊ विभागात लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरु आहे. त्यामुळेच याचा फटका थेट दहावी-बारावीच्या निकालावर होऊ शकतो. असं विठ्ठल सरोदे, उपाध्यक्ष, बोर्ड कर्मचारी महासंघटना यांनी सांगितले आहे.
बारावीचा निकाल (12th Result Date) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता या आंदोलनामळे हा निकाल लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.










