मुंबई | नगर सह्याद्री
ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये राज्य सरकारने मोठा निर्णय घेत वीज दरात मोठी कपात केली. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहे. १० ते १४ टक्क्यांनी वीज दर कमी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना वीजेचे बिल कमी येणार आहे. परिणामी राज्यातील सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण कमी होईल.
वीज दरामध्ये कपात केल्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांसाठी नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार आहे. नवीन वीज दरानुसार, विजेच्या वापराच्या सर्व चारही टप्प्यांमधील दरामध्ये कपात करण्यात आली आहे. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात केली आहे. तर बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणार्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त दरामध्ये वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सर्वांनाच वीज बिल कमी येईल.
वीज दर कपातीच्या निर्णयानुसार, ० ते १०० युनिट्सपर्यंतच्या वापरासाठी ९.७ टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजे ४.७६ रुपयांऐवजी आता ४.३० रुपये द्यावे लागणार आहे. १०१ ते ३०० युनीटसाठी १०.८ टक्के कपात केली आहे. म्हणजेच ७,९६ ऐवजी ७.१० रुपये द्यावे लागणार आहेत. ३०१ ते ५०० युनीटमध्ये १४ टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजेच १३.५५ ऐवजी आता ११.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. तर ५०० पेक्षा अधिक युनीटमध्ये १३.१ टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजे आता १४.५५ रुपयांऐवजी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत.
दरम्यान, महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा यासारख्या वीज वितरण कंपन्यांनीच नवीन वीजदर लागू करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या वीज वितरण करणार्या कंपन्यांच्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर वीज दरात कपात करण्यात आली आहे. या कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर आधारित नवीन वीज दर निश्चित करण्यात आले आहेत. याचा फायदा राज्यातील सर्वसामान्यांना होणार आहे. या निर्णयामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.










