मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा अजूनही कायम असून सक्रीय होण्यास अजून ५ ते ६ दिवसांचा विलंब लागणार आहे. पुणे हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यास अजून अनुकूल वातावरण नाहीये. पुढील २४ ते ४८ तासांत राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, तो मुंबईसह उर्वरित राज्यात दाखल होण्यासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून मध्य महाराष्ट्रातच अडखळला आहे. उत्तर भारतातील उष्ण वाऱ्यांनी त्याचा प्रवास थांबला. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे.
विदर्भात पारा पुन्हा ४३ अंशांवर आहे.गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की, मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट २० जून उजाडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनने हैदराबाद, ओडिशाच्या किनारपट्टी भागात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागात वाटचाल केली असून महाराष्ट्रात मात्र मान्सून पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील काही भागात अजूनही मान्सून सक्रिय झालेला नसून काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. अशी माहिती हवामान वेधशाळेचे शास्त्रज्ञ एसडी सानप यांनी दिली आहे.










