माझ्याकडून अनवधानाने ते शब्द गेले: तहसीलदार सचिन डोंगरे
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांनी ‘मी भारतीय संविधानाला मानत नाही’, असे कथित विधान केल्याचा आरोप होताच सोमवारी तहसील कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी संविधानप्रेमी चळवळीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार तहसीलदारांच्या दालनात एकत्र आले.
यावेळी उपस्थितांनी संबंधित कथित विधानाबाबत विचारणा केली असता, तहसीलदारांनी माझ्याकडून अनवधानाने ते शब्द गेले. मला उचकवण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे ते शब्द माझ्या तोंडून निघाले, असे स्पष्टीकरण दिल्याचे उपस्थितांनी सांगितले.
मात्र, या स्पष्टीकरणावर पत्रकार आणि संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत भारतीय राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असून तिच्याविषयी अशा प्रकारचे कथित विधान कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याकडून होणे गंभीर बाब असल्याचे नमूद केले. उचकवले गेले म्हणून संविधानाविषयी असे शब्द वापरण्याचे समर्थन होऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यानंतर उपस्थितांनी तहसीलदारांनी लेखी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली.
माझ्याकडून अनवधानाने शब्द गेले असून त्या विधानाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असा आशय असलेले दोन ओळींचे लेखी निवेदन द्यावे, अशी विनंती करण्यात आली. मात्र, उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, तहसीलदारांनी लेखी दिलगिरी देण्यास नकार अथवा टाळाटाळ केली. यामुळे उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतीय राज्यघटना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानिक मूल्यांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी लेखी दिलगिरी आवश्यक असल्याचे सांगत, ती न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संविधानप्रेमी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
याप्रसंगी बसपा प्रभारी सुनील ओहोळ, आरपीआय जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, वसंतराव सकट, चंदन घोडके, अंकुश शिंदे, पत्रकार अमोल झेंडे, अमर घोडके, भीमा घोडके, श्रीरंग साळवे, सचिन शिंदे, अंबादास घोडके, प्रमोद आहेर, अंकुश तुपे, सत्यवान शिंदे, भाऊसाहेब कोरडकर, अमोल कोरडकर, सखाराम धायगुडे, पांडुरंग धायगुडे, जौजाळ यांच्यासह आंबेडकरवादी चळवळीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.










