पुणे / नगर सह्याद्री –
एकीकडे राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना दुसरीकडे मात्र मान्सूनच्या आगमनासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ मे २०२६ रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार होता, परंतु केरळच्या किनारपट्टीवर मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होतो, मात्र यंदा हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे त्याच्या आगमनात उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन उशिरा होणार असून पुढील काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
भारतीय हवामान विभागाने यापूर्वी २६ मेच्या सुमारास केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, या अंदाजात चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, कमकुवत वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मान्सूनची गती मंदावल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता 8 ते 10 जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मान्सूनची सध्याची स्थिती पाहता तो अरबी समुद्रातून पुढे सरकत श्रीलंका मार्गे अंदमान-निकोबार बेटांपर्यंत पोचला आहे. मात्र, केरळमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली अनुकूल हवामान स्थिती अद्याप पूर्णपणे निर्माण झालेली नाही. पुढील चार दिवसांत परिस्थिती अनुकूल झाल्यास मान्सूनच्या आगमनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
दरम्यान, महाराष्ट्रात हवामानात काही प्रमाणात बदल दिसून येत आहेत. विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात सध्या उष्णतेची लाट जाणवत असली, तरी २८ मेनंतर हवामानात फरक जाणवणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी सांगितले की, केरळमधील सध्याची परिस्थिती मान्सूनपूर्व पावसासारखी असून मान्सूनच्या आगमनात विलंब होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या वातावरणातील आर्द्रता, वाऱ्यांची दिशा आणि समुद्राचे तापमान या सर्व घटकांवर हवामान विभाग बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले. एकूणच, मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता कायम असून पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. परिस्थिती अनुकूल झाल्यासच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.










