अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे 40 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बुऱ्हाणनगर पाणी योजनेच्या मुख्य पाइपलाइनमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची उघडपणे नासाडी झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान प्रवाशांनी उंच उडणाऱ्या कारंजाखाली गाड्या उभ्या करत धुवून घेतल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, तपोवन रोडवरील हॉटेल इंद्रायणी परिसरात टँकर भरण्यासाठी पाइपलाइनवर विशेष वॉल्व्हची व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी एका टँकरचा धक्का बसल्याने व्हॉल्व्ह तुटला आणि प्रचंड दाबाने पाण्याचे उंच कारंजे उसळू लागले. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू राहिल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
दरम्यान, काहींनी या पाण्यात वाहने धुतली, तर अनेकांनी धबधब्यासारख्या कोसळणाऱ्या पाण्याखाली उभे राहून मजा लुटली. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनाही या अनपेक्षित पाण्याच्या वर्षावाचा अनुभव आला. मात्र हजारो लीटर पाणी वाया गेले. पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना, अशा प्रकारे पाण्याची नासाडी होणे गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाइपलाइन फुटल्यानंतर जवळपास दोन तासांनी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांना पाणी वाचवा म्हणणारे अधिकारी, हजारो लिटर पाणी वाया जात असताना नेमके कुठे होते? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.










