अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
गुरुवारी पांजारपोळ मैदान, माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. “बाबासाहेबांचा विजय असो”, “जय भीम म्हणत चला”, “भीमराजा माझा”, “निळ्या झेंड्याखाली”, “माझा भीमराजा महान”, “उठा उठा हो भीमसैनिकांनो” यांसारख्या भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हजारोंच्या संख्येने भीमसैनिक व नागरिकांनी उपस्थिती लावत कार्यक्रम ऐतिहासिक ठरवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी गायक आनंद शिंदे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आले.
नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांनी सांगितले की, अहिल्यानगरमध्ये भीम उत्सव बौद्ध पौर्णिमेपर्यंत महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे. तसेच १४ एप्रिल रोजी भव्य जयंती मिरवणूक काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बाबासाहेबांच्या १३५व्या जयंतीनिमित्त शहरात सुरू झालेला हा उपक्रम विशेष आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी पूर्ण झाली असून आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार झाले आहे. हा पुतळा केवळ मूर्ती नसून समाजाला प्रेरणा देणारा शक्तिस्थान आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या भव्य कार्यक्रमामुळे संपूर्ण शहर भीममय झाले असून आंबेडकरी समाजासह सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, प्रा. जयंत गायकवाड, विलास साठे, शरद मेढे, अंकुश मोहिते, पप्पू पाटील, मुन्ना भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, सतीश शिरसाट, जय कदम, विशाल कांबळे, प्रा डी आर जाधव, सचिन शेलार, सागर ठोकळ, गौरव साळवे गौतमी ताई भिंगारदिवे, येसुदास वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.










