पारनेर | नगर सह्याद्री
देशभरात वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी जनता त्रस्त असतानाच, दुसरीकडे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आणि महापुरुषांचा अवमान करण्याचे प्रकार वाढले आहेत. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि संवैधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी पारनेरमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे निवेदन पुरोगामी चळवळीतील संघटनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक नितीन खंडागळे यांच्याकडे देण्यात आले. दरम्यान मंगेश बेकारसेवर देशद्रोहाचा गुन्हा दखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सध्या देशात जाती-धर्माच्या नावाखाली प्रक्षोभक वक्तव्ये करून समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. बहुजन महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून, अशा प्रकरणांत पोलीस प्रशासनाकडून दाखवल्या जाणाऱ्या उदासीनतेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्यासाठी लोकशाही मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना करंदीकर म्हणाले की, पारनेर पोलीस प्रशासनाने महापुरुषांची बदनामी करणाऱ्या मंगेश बेकारसे यांच्यावर कठोर कारवाई न करता त्याला सोडून दिले आहे. त्यामुळे सोमवार 15 तारखेपर्यंत मंगेश बेकारसे यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर संपूर्ण जिल्ह्यात पुरोगामी चळवळीतील पक्ष व संघटना जेलभरो करणार असल्याचे राजेंद्र करंदीकर यांनी सांगितले.
यावेळी प्रशासनाला दिलेल्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून अपमान करणाऱ्या मंगेश बेकारसे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकीय सनद रद्द करण्यात यावी. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री, मनोहर कुलकण (भिडे) आणि अनिल मिश्रा यांसारख्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न थांबवावेत. मंगेश बेकारसे आणि त्याचे समर्थक स्वसंरक्षणार्थ आंदोलनकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दलित-आदिवासींवरील अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणांत हस्तक्षेप करून आपला वैयक्तिक स्वार्थ साधणाऱ्या समाजविघातक दलालांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या शोषित-पीडित नागरिकांची पोलीस कर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आणि शोषण तत्काळ थांबवावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य) यांच्या नावे पारनेर पोलीस स्टेशनला देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, जिल्हा अहमदनगर यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.










