मुंबई । नगर सह्याद्री –
वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता या प्रकरणात एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याचे भोंदूबाबाशी असलेले संबंध पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडली. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, दत्ता कराळे यांच्यासारखे जबाबदार वरिष्ठ अधिकारी अशोक खरात याच्या कार्यक्रमात का गेले होते? एवढेच नव्हे तर, त्या कार्यक्रमात त्यांनी भाषणही दिले होते. जेव्हा सामान्य जनता एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याला अशा बाबांच्या व्यासपीठावर पाहते, तेव्हा त्यांचा अशा भोंदूगिरीवर विश्वास बसणे स्वाभाविक आहे. दमानिया यांनी असा दावा केला आहे की, कराळे आणि खरात यांच्यात तब्बल १८ वेळा फोनवरून संभाषण झाले आहे.
या सर्व प्रकरणाची ‘विभागीय दक्षता’ पथकाकडून तातडीने चौकशी व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कराळे यांच्याकडून उत्तर मागवावे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भोंदूबाबाशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे इतक्या जवळचे संबंध असणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशोक खरात याच्यावर भोंदुगिरी, जादूटोणा आणि लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे अनेक महिलांनी खरातवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असून त्याच्यावर आतापर्यंत डझनभर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अशा गुन्हेगाराला जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असेल, तर पीडितांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अंजली दमानिया यांच्या या आरोपांमुळे नाशिक पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनच जर अंधश्रद्धेला आणि गुन्हेगारांना खतपाणी घालत असेल, तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असा सूर उमटत आहे. दरम्यान, या आरोपांनंतर अद्याप आयजी दत्ता कराळे किंवा नाशिक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेला वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










