राहुरी | नगर सह्याद्री
स्विफ्ट कार व रिक्षाच्या अपघातात एक महिला ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. नगर मनमाड राज्य महामार्गावरील कृषी विद्यापीठाजवळील डिग्रस फाट्याजवळ शुक्रवार 17 जुलैला सायंकाळच्या वेळेत अपघाताची ही भीषण घटना घडली.
चांगुनाबाई भिमा पवार व त्यांचे पती 17 जुलैला सायंकाळी 5 वाजे दरम्यान ॲपे रिक्षामध्ये बसून राहुरीकडून डिग्रस येथे जात होते. रिक्षा नगर मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्याकडे रस्ता ओलांडत असताना नगर कडून राहुरीकडे येणाऱ्या एम.एच. 14 बी.ए 5064 या कारची ॲपे रिक्षाला जोरदार धडक बसली. यावेळी रिक्षा तीन पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

अपघातात रिक्षामधील चांगुनाबाई भिमा पवार (वय 55) या जागीच ठार झाल्या तर रिक्षा चालक ताया सिताराम शिंदे (राहणार गोटूंबे आखाडा), भिमा बाबूराव पवार (राहणार डिग्रस) तसेच कारमधील दिपक संभाजी हारे, रोहिणी दिपक हारे व त्यांचा मुलगा दक्ष दिपक हारे (वय 10, राहणार लोणी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच डिग्रस व गोटुंबा आखाडा परिसरातील नागरिकांनी राहुरी ग्रामीण रुग्णालया समोर मोठी गद केली होती. चांगुनाबाई पवार यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










