मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिला ओळखले जाते. सध्या ती आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना तिने एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने समाजातील महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधत तिचे स्पष्ट मत मांडले.
पूजाने प्राण्यांवरील क्रौर्याबाबत बोलताना कायद्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, भारतात प्राण्यांना इजा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदे नाहीत. अगदी गंभीर प्रकार घडला तरी केवळ किरकोळ दंड भरून आरोपी सहज सुटतो, ही बाब चिंताजनक असल्याचे तिने सांगितले. संधी मिळाली तर हा कायदा नक्की बदलण्यावर भर देईन, असेही तिने स्पष्ट केले. याशिवाय, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही पूजाने ठाम भूमिका मांडली.

देशात आजही स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून वेदना होतात, असे सांगत तिने अशा गुन्ह्यांवर कठोर आणि तात्काळ शिक्षा होणे गरजेचे असल्याचे म्हटले. गुन्हेगाराच्या मनात कायद्याची भीती निर्माण झाली, तरच अशा घटनांना आळा बसेल, असा तिचा विश्वास असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली “दुर्दैवाने आजही भारतात स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत, ते पाहून खूप वेदना होतात. यासाठी मला कायदे अधिक कडक करायला आवडतील.

जर गुन्हेगाराला माहीत असेल की, शिक्षा तात्काळ आणि अत्यंत भयानक मिळणार आहे, तर तो कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार करेल ”कायद्याचा धाक हा गुन्हेगारांना रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे ती म्हणाली. दरम्यान, पूजा सावंत हिचा ‘सालबर्डी’ हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ती पोलीस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.










