मुंबई / नगर सह्याद्री –
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो काही दिवसांतच महाराष्ट्रात धडकला. आता हळूहळू मान्सून इतर भागात सक्रीय होत त्याची पुढच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. देशातील १७ राज्यांसाठी पुढचे ७२ तास महत्वाचे असणार आहेत. या राज्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून ८० किमीच्या वेगाने वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी आर्द्रता, वादळसदृश्य परिस्थिती यामुळे हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील अनेक राज्यात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने १७ राज्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस आणि सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. याठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे या राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्याने बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांसाठी पुढचे ७२ तास महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह ७० ते ८० किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. या पावसादरम्यान अनेक ठिकाणी झाडं पडण्याची, वीज पुरवठा खंडीत होण्याची आणि भूस्खलन होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
अहिल्यानगर, मुंबई, पुण्यासह ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, काय आहे हवामान खात्याचा इशारा…
उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी पावसाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात अखेर पावसाचे आगमन होणार असून आज ३० जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस सांगितलं आहे.
मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह जवळपास संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वादळी वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पावसाळी वातावरणादरम्यान काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, तसेच विजांचा कडकडाटही होईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह जवळपास संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस हजेरी लावणार आहे.
बंगालच्या उपसागरावरून पुढे चाल करत मंगळवारी मान्सूनने संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीम राज्य व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागातही मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रावरून चाल न झाल्याने हर्णे, सोलापूरपर्यंत मॉन्सूनची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागासह, संपूर्ण तमिळनाडू, पश्चिम बंगालचा आणखी काही भाग, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशा, राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
‘या’ ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बीड, परभणी, लातूर, धाराशीव, नांदेड, हिंगोली










