अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक ः ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, टोल फ्री क्रमांक: १०७७. परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी, भारतीय दूतावास / कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, आपले लोकेशन (ठिकाण) आणि सद्यस्थितीची माहिती कुटुंबाला सतत कळवावी, मोबाईलची बॅटरी चार्ज राहील याची काळजी घ्यावी आणि पासपोर्ट-व्हिसासह सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत, सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये, भारतीय दूतावासाकडे आपली नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
विविध देशांतील भारतीय दूतावासांचे २४ु तास आपत्कालीन क्रमांक उपलब्ध : तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी विशेष आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. नागरिकांनी गरजेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सुचवण्यात आले आहे.
राज्य, जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक
आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत : टोल फ्री क्रमांक : १०७०, फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३ ई- मेल : लेपीीेंश्रीेेार्सेीं.ळप तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत, त्यांच्याबाबतची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










