लोणी / नगर सह्याद्री –
‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीद वाक्य घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीसाठी समर्पित असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सामाजिक उपक्रमाच्या आयोजनातून एक उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेला ६ एप्रिल २०२६ रोजी ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षाच्या यशस्वी वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून, जिल्ह्यातील सर्व मंडलामध्ये स्थापना दिवसाचे कार्यक्रम पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुखांच्या माध्यमातून संपन्न होणार असून, यासर्व उपक्रमात नागरीकांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
भारतीय जनता पक्षाची वाटचाल “अंत्योदय चळवळ ते विकसित भारत” असा सुरू आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नविन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल देशाप्रती समर्पित भावनेन सुरू असून, कोट्यावधी कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन संपूर्ण देशात आणि राज्यात पक्षाच्या विचारधारेसाठी कार्यरत असल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजपाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रथम क्रमाकांचा पक्ष म्हणून भाजपाचा जनाधार वाढत गेला आहे. विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेले यश हे पक्षाच्या राष्ट्रीय विचारधारेचे आहे.
स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्ष पदाधिकरी, कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर पक्षाचा ध्वज फडकविण्याचे आवाहन करुन, मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भाजपाचा झेंडा हा राष्ट्रहीताच्या विचारधारेचे व राष्ट्रसेवेच्या निर्धाराचे आणि समर्पनाचे प्रतिक आहे. पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकीने सेवाभावी उपक्रम राबवले जाणार असून, केंद्र राज्य सरकारच्या योजना नागरीकांपर्यत पोहोचवून पक्षाच्या राष्ट्रसाधनेचा गौरवशाली प्रवास बुथस्तरावरील प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.










