पारनेर/कान्हूरपठार | नगर सह्याद्री
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने सरसकट कर्जमाफीसाठी स्मार्ट मीटरच्या विरोधात मनरेगा व प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला संबोधित करताना भाकप तालुका सचिव कॉ. संतोष खोडदे यांनी शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही त्यांनी केलेल्या घोषणेला हरताळ फासणारी आहे. सरसकट कर्जमाफी करण्याऐवजी अटी व शर्ती लादून अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना आहे म्हणून शासनाने घोषित केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी केली
किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. सुभाष ठुबे यांनी शासनाचे स्पष्ट आदेश असूनही वीज वितरण कंपनीकडून घर मालकाची परवानगी न घेता परस्पर स्मार्ट मीटर बसवत आहेत. हे स्मार्ट मीटर वीज ग्राहकांची लूट करणारे आहेत. घर मालकाच्या परवानगीशिवाय हे स्मार्ट मीटर बसू नयेत. ग्राहकाने मागणी केल्यास त्याला त्याचे जुने मीटर बसून द्यावेत व ही स्मार्ट मीटरची योजना तात्काळ बंद करण्याची मागणी केली.
तालुका सहसचिव कॉ. कैलास शेळके यांनी केंद्र शासनाने मनरेगा कायद्या ऐवजी आणलेला व्हीबीग्रामजी कायदा हा आर्थिक बोजा राज्य सरकारवर टाकणारा असून हा कायदा रद्द करून जुना मनरेगा कायदा सुधारणांसह पुन्हा अंमलात आणावा तसेच विद्याथ पटसंखेचे कारण दाखवून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नयेत, शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव देण्यात यावा व कांद्याची निर्यात खुली ठेवण्यात यावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी कॉ.बबनराव बालके, संतोष खोडदे, सुभाष ठुबे, माऊली करंजुले, जयसिंगराव गायकवाड, बबनराव रावडे, सागर व्यवहारे, हेमंत पाटील, बापू गायकवाड, संजय जाधव, हरिभाऊ गायकवाड, किरण खामकर, संजय भगत, नानाभाऊ खामकर, सुरेश होले, चंद्रकांत चौधरी, संपत रावडे, दादाभाऊ शिंदे, सुदाम गायकवाड, अण्णासाहेब शिंदे, अंकुश गायकवाड,नामदेव ठुबे, बबन दिवटे, दत्तात्रय झगडे, अजित गायकवाड, दादा रावडे, कारभारी कोठावळे, आर. टी. ठुबे, गौतम जाधव, संतोष सालके, बापू गावडे , रावसाहेब गायकवाड, सुलाबाई आदमाने, मैनावती दिवेकर, रखमाबाई शेळके, भागुबाई मुंगसे, छाया ठुबे, निर्मला खोडदे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. मोर्चाचे निवेदन तहसीलदार गायत्री सौंदाने यांना देण्यात आले.










