मुंबई / नगर सह्याद्री –
इस्रायल आणि इराणमधील युद्ध पेटलं असून पश्चिम आशियामधील अनेक देशामधील विमान उड्डाण रदद करण्यात आली आहेत. याचा फटका भारतीय नागरिकांना बसलाय. भारतातील हजारो पर्यटक दुबई आणि सौदी अरबमध्ये अडकली आहेत. तेथील विमानतळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेकडो पर्यटक दुबई आणि सौदी अरेबियामध्ये अडकलेत. स्थानिक वृत्तानुसार हे पर्यटक सुट्टीवर किंवा तीर्थयात्रेसाठी गेले होते. परंतु विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे त्यांना घरी परतता येत नाहीये. दुबई आणि अबू धाबीमधील एअर पेस बंद झाल्यामुळे जागतिक विमानसेवा विस्कळीत झाली आहे. स्थानिक सूत्रांनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पर्यटक भारतात प्रवास करू शकत नाहीत आणि विमानतळांवर अडकून पडलेत.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पर्यटक परदेशात अडकले
जळगाव: दुबईमध्ये ६२ पर्यटक
सांगली: दुबईमध्ये ३० पर्यटक
सोलापूर: दुबईमध्ये ४३ पर्यटक
नागपूर: सौदी अरेबियामध्ये ४३ पर्यटक
कोल्हापूर: दुबईमध्ये १०० पर्यटक
संभाजी नगर: दुबईमध्ये १५० पर्यटक
ठाणे: दुबईमध्ये २५ पर्यटक
लातूर-नाशिक-धाराशिव: दुबईमध्ये २५-३० पर्यटक
हे पर्यटक विमानतळावरील हॉटेलमध्ये थांबलेत. मध्य-पूर्व शहरात युद्ध पेटल्याने अनेक हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. एअर इंडियाने युएई, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे त्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरही पर्यटक अडकलेत
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंडिगो आणि एअर इंडियाने युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत. जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय केंद्र असलेल्या दुबईमध्ये सध्या बंदचा सामना करावा लागत आहे, यामुळे हजारो प्रवाशांवर परिणाम झाला आहे.










