तातडीने पुरवठ्याची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सध्या तालुक्यातील विविध कृषी केंद्रांवर युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही अनेक शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर युरियाची गरज असताना पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
निवेदनात राजदेव यांनी कृषी विभागाने पारनेर तालुक्यासाठी युरियाचा अतिरिक्त कोटा मंजूर करून पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. तसेच कृषी केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी सोसायट्या किंवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून खत वितरणाचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. यासोबतच खतांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्री किंवा सक्तीची लिंकिंग होत असल्यास संबंधित कृषी केंद्रांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने पुढील दोन ते तीन दिवसांत याबाबत ठोस निर्णय घेऊन परिस्थिती सुधारली नाही, तर निलेश लंके प्रतिष्ठान व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रविंद्र राजदेव यांनी दिला आहे.










