पुणे / नगर सह्याद्री –
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज तीन महिने पूर्ण झाले. या प्रकरणातील तपासावरून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार हे अपघात झाल्यापासून सर्वांशी चौकशीसाठी भिडत आहेत. अपघात की घात, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. या प्रकरणी CID तपास चालू आहे. रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आज रोहित पवार CID कार्यालयात महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. “आम्ही तिसऱ्यांदा आलो आहोत, पण एकही अधिकारी नाही. तपास गंभीरपणे घेतला जात नाही,” असा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा सुरू असल्यामुळे कोणी उपस्थित नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. पुढच्यावेळी आम्हाला इथल्या वॉचमनशी चौकशीवर बोलावे लागेल की काय, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“बारामतीतला कार्यकर्ता खरातला भेटला”
दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक मुद्दे पुढे आणले. बारामतीतील एका छोट्या नेत्याचे नाव अप्रत्यक्षपणे जोडले आहे. बारामतीतील अजित पवारांच्याच पक्षातील एक कार्यकर्ता अशोक खरातला भेटायला जात असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला. त्याचा पुढील तपास करण्यात यावा अशी देखील मागणी केली आहे. या नेत्याचे आर्थिक व्यवहार आणि काही संशयास्पद संपर्क असल्याचा आरोप त्यांनी केला.
काळ्या जादूचा प्रयोग याचबरोबर, काटेवाडी परिसरात २७, २८ आणि २९ तारखांना काही पूजा झाल्याचा उल्लेख करत त्यांनी काळ्या जादूचा संशयही व्यक्त केला. या पूजांमध्ये बोकड बळी दिल्याचीही चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही यावर विश्वास ठेवत नाही, पण एकाच घराबाहेर सलग तीन दिवस पूजा का झाल्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका शेतकऱ्याला पवार कुटुंबावर मोठा आघात होईल, असा इशारा देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.
तपास यंत्रणांवरही त्यांनी टीका केली. DGCA आणि AIB कडून माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी ब्लॅक बॉक्स (CVR आणि FDR) संदर्भात उशिरा माहिती देण्यात आल्याचा आरोप केला. तसेच अमेरिकेची NTSB संस्था या प्रकरणाचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
“दोषींना सोडणार नाही”
“मोठ्या नेत्यालाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाचं काय?” असा सवाल करत त्यांनी या प्रकरणात दोषींना सोडणार नसल्याचा इशारा दिला. तसेच काही नेत्यांवर दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.










