श्रीगोंदा | नगर सह्याद्री
गेल्या सुमारे 50 वर्षांपासून बंद असलेला श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव-चांडगाव दरम्यानचा शिवरस्ता अखेर मोकळा करण्यात आला असून शेतकऱ्यांनी याबद्दल तलाठी राम गोरे यांचे विशेष आभार मानले आहेत.
या शिवरस्त्याच्या प्रश्नासाठी दोन्ही गावांतील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत हिरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्याताई बनकर यांनी तलाठी राम गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर तलाठी राम गोरे यांनी संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून प्रयत्न करून हा शिवरस्ता मोकळा केला.
सुमारे 12 फूट रुंदीचा व 3.5 किलोमीटर लांबीचा हा शिवरस्ता आता रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्याचा 100 हून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना थेट फायदा होणार असून, शेतजमिनीपर्यंत जाणे-येणे आता अधिक सोयीचे झाले आहे. शिवरस्ता सुरू झाल्याने हिरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्याताई बनकर, उपसरपंच अमोल दरेकर, सामाजिक कार्यकर्ते संपत दरेकर, चेअरमन भरत भुजबळ, माजी चेअरमन शोभा दरेकर तसेच हिरडगाव ग्रामस्थांनी तलाठी राम गोरे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.










