राहुरी | नगर सह्याद्री
अहिल्यानगर (विळद बायपास) ते मनमाड (सावळी विहीर) या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था, अपघाताच्या घटना बाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली असून न्यायालयाने संबंधित कंत्राटदार कंपन्यांनाही प्रतिवादी म्हणून आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ॲड. शिवराज कडू पाटील यांच्या माध्यमातून या रस्त्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत राहुरी हद्दीतील महामार्गावरील धोकादायक स्थिती, मोठे खड्डे, अपघाताच्या वाढत्या घटना आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. याचिकेनुसार, गेल्या तीन वर्षांत राहुरी तालुका हद्दीत झालेल्या अपघातात 30 पेक्षा अधिक निरपराध लोकांचा मृत्यू, तर गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेषतः मागील आठ महिन्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूव न्यायालयाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संबंधित कंत्राटदार कंपन्यांनाही प्रतिवादी करण्यात आल्यानंतर आता पुन्हा सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. शिवराज कडू पाटील, शासनातर्फे ॲड. निखील टेकाडे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ॲड. विरेंद्र साकोळकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
याचिकेत अपघातप्रवण ठिकाणी इशारा फलक उभारणे, ब्लॅक स्पॉटची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, दोषपूर्ण कामांची दुरुस्ती, अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी करण्यात आली आहे.
महामार्गाच्या दुरवस्थेमुळे जीव मुठीत धरून प्रवास
शिड, शनि शिंगणापूर ही जागतिक ख्याती असलेले धार्मिक स्थळाकडे जाणारा महामार्ग म्हणून अहिल्यानगर-मनमाडची ओळख आहे. हाराष्ट्रासह पर राज्यातील मालवाहू वाहनांची देखील या या मार्गावर मोठी वर्दळ आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरीकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.










