श्रीगोंदा | नगर सह्याद्री
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी गावातील विविध विकासकामांचा तसेच शासकीय निधीच्या वापराचा आढावा घेत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बैठकीत ग्रामस्थांनी गावातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी पाण्याची कमतरता तसेच वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. ग्रामस्थांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सर्व प्रश्नांची नोंद केली.
डॉ. आशिया म्हणाले, ग्रामस्थांनी मांडलेल्या ज्या समस्या जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर सोडविता येतील त्या तातडीने निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्रश्न वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून माग लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या दौऱ्यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणीताई फराटे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, गट शिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी, नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्यासह पंचायत समिती, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण आदी विविध विभागांचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










