अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
शहरामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत विभागाच्या वतीने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा आणि रात्री सतत होणार्या वीजखंडितीमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार लाईट जात असल्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण विभागाविरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांना निवेदन देत येत्या आठ दिवसांच्या आत वीज पुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकार्यांना काळे फासण्यात येईल, असा तीव्र इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांना निवेदनाद्वारे दिला.
यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, प्राध्यापक माणिक विधाते, संभाजी पवार, साधना बोरुडे, रोहिणी अंकुश, सागर गुंजाळ, सुरज कोतकर, सुरत शिंदे, दीपक खेडकर, नितीन घोडके, रणजीत सत्रे, मनोज नन्नवरे, दीपक गांगर्डे, मारुती पवार, ऋषिकेश ताठे, शैलेश मते आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, अहिल्यानगर शहरामध्ये दिवस-रात्र कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे. भर उन्हाळ्यात नागरिक त्रस्त झाले असून अधिकारी मात्र एसी कार्यालयात बसून स्वतःची काळजी घेत आहेत. जनतेच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लाईट गेल्यामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान होत असून पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. नागरिकांनी वीजबिल एक दिवस जरी भरले नाही तर महावितरण विभाग तत्काळ कनेशन कट करतो. मात्र वारंवार होणारी ट्रिप लाईट सुरू करण्यासाठी विभागाकडे वेळ नसतो. त्यामुळे हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याचे दिसून येते.
महावितरण विभागाने तातडीने सुधारणा केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या दालनात कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि वरिष्ठ अधिकार्यांना काळे फासण्यात येईल. असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.










