सुरोडी, वडाळी ग्रामस्थांचे आंदोलन
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
राज्य सरकारच्या कथित फसव्या शेतकरी कर्जमाफी धोरणाच्या निषेधार्थ सुरोडी गावचे नेते भास्कर बापुराव वागसकर यांच्या नेतृत्वाखाली सुरोडी व वडाळी परिसरातील शेतकरी बांधवांनी शांततापूर्ण आंदोलन करत श्रीगोंदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, सर्व शेतकऱ्यांचे सातबारा उतारे कोरे करण्यात यावेत आणि अपूर्ण व दिशाभूल करणाऱ्या कर्जमाफी योजनांचा पुनर्विचार करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी आंदोलकांनी शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत, शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय तातडीने घ्यावेत, अशी मागणी केली. अन्यथा आगामी काळात लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.या आंदोलनात वडाळी गावचे सरपंच नानासाहेब काळे, युवा नेते सचिन वागसकर, संजय वागसकर, मराठा सेवक अभयराज मोरे, सुरोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते कचरू वागसकर, सेवा संस्थेचे संचालक संतोष वागसकर, बेलवंडी येथील मारुती सुंबे, संतोष शेलार पाटील, कुकडी साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंदे, सुरोडीचे उपसरपंच मनोहर वागसकर, दुर्योधन वागसकर, विनायक वागसकर, चंद्रशेखर वागसकर, संजय वागसकर, संदीप वागसकर, गणेश रुपनेर, संभाजी वागसकर, राजू शिंदे, वाल्मिक पवार यांच्यासह सुरोडी, बेलवंडी आणि वडाळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.












