तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी शरद पवार, रॉबिन सिंग पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सोशल मीडियावर खासदार निलेश लंके यांच्या विरोधात व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून तरुणाचे पुण्यातील खराडी भागातून अपहरण करून त्याला अहिल्यानगर जिल्ह्यात अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद खंडू पवार, रॉबीन सिंग या आरोपींना पोलिसांनी पुणे येथे ताब्यात घेतले.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी किशोर महादेव परभणे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने खासदार लंके यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. याचाच राग मनात धरून आरोपी प्रणय विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे (दोघे रा. चिचोंडी पाटील), रॉबीन सिंग आणि एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचे पांढर्या रंगाच्या स्वीफ्ट कारमधून अपहरण केले. चिचोंडी पाटील येथे नेवून तिथे त्यांचे कपडे काढून, हात-पाय बांधून लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली. अमानुष छळ केला. नगर तालुका पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने शरद खंडू पवार व रॉबीन सिंग या दोघांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
नगरमध्ये कापड व्यावसायिक तरुणावर पिस्तूल रोखले
कुटुंबालाही मारहाण | कोतवालीत गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहर परिसरातील कल्याण रस्ता भागात जुन्या ओळखीच्या दोन तरुणांनी एका कपडा व्यवसायिकाशी वाद घालत थेट पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील रहिवासी सनी राजेंद्र जाधव यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सनी हे त्यांच्या मित्रासोबत घरासमोरील औषध दुकानात आले होते. त्यावेळी बोल्हेगाव येथील जुने परिचित रवी साळुंके आणि निखील चव्हाण हे दोघे तिथे आले. त्यांनी सनी यांच्याशी जुन्या कारणावरून हुज्जत घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने निखील याने सनी यांचे हात पाठीमागून घट्ट धरून ठेवले. याच वेळी रवी साळुंके याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून ते लोड केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
सनी यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केली. आवाज ऐकून सनी यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक मदतीसाठी धावून आले. सर्वांनी मिळून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपींनी सनी यांच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना लाथाबुक्क्यांनी व हाताने बेदम मारहाण केली. यावेळी सनी यांच्या वडिलांनी धाडस दाखवून आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले. नागरिकांची गर्दी जमताच दोन्ही आरोपी तिथून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सनी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी रवी साळुंके आणि निखील चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
जुन्या वादाच्या कारणावरुन तरुणावरलाकडी दांडयाने जीवघेणा हल्ला
पाच जणांवर कोतवालीत गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहर परिसरातील जाधवनगर, कल्याण रस्ता भागात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडयाने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी ज्ञानेश्वर साळुंके (वय ३० वर्ष, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर) हे आपल्या मित्रासह परिसरात गेले होते. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जाधवनगर येथील साई रुग्णालयाच्या समोर आरोपींनी त्यांना गाठले. पूर्ववैमनस्यातून आरोपी सनी जाधव, त्याचे वडील राजेंद्र जाधव, समीर जहागीरदार, प्रमोद दाणे आणि अक्षय जाधव (सर्व राहणार जाधवनगर, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्यादी रवी साळुंके यांना अचानक गाठून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्))यास सुरुवात केली. वाद वाढल्याने सर्व आरोपींनी एकत्र येत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव याने हातातील लाकडी दांडयाने रवी साळुंके यांच्या डोयावर जोरदार प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली.
आपल्या मित्राला वाचवण्यासाठी निखिल चव्हाण हा मध्यस्थी करण्यासाठी धावला असता, सर्व आरोपींनी त्यालाही लक्ष्य केले. आरोपींनी निखिल यालाही लाकडी दांडयाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचेही डोके फोडले. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. जखमी अवस्थेत दोघांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फिर्यादी रवी साळुंके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी सनी जाधव, राजेंद्र जाधव, समीर जहागीरदार, प्रमोद दाणे आणि अक्षय जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवादार पालवे करत आहेत.
आमदार संग्राम जगताप यांच्यावर आक्षेपार्ह टीका
अहिल्यानगर ः सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आमदार संग्राम जगताप आणि हिंदू धर्माबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अनुप शेखर झाडबुके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी झाडबुके हे १७ मे रोजी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना, त्यांना इंस्टाग्रामवर एका आयडीवरून प्रसारित झालेला व्हिडिओ आढळला. या व्हिडिओमध्ये अफरोज हमीद शेख (रा. केडगाव, अहिल्यानगर) नावाच्या महिला आरोपीने आमदार संग्राम जगताप यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली. तसेच हिंदू धर्म आणि धार्मिक श्रद्धांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. अहिल्यानगर शहराच्या नावाचा उल्लेख करून समाजात द्वेष पसरेल, असे गंभीर विधानही तिने या व्हिडिओत केले होते. या वादग्रस्त व्हिडिओमुळे अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला
अहिल्यानगर ःभारत निवडणूक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर आणि टाळाटाळ केल्याप्रकरणी सावेडी येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) राजेंद्र बबन फुलारी यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील बाजीराव नेटके यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सुनील नेटके हे पेमराज सारडा कॉलेजमध्ये ग्रंथालय लिपीक असून, मे २०२५ पासून निवडणूक शाखेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अंतर्गत एकूण १० बीएलओ काम पाहतात, ज्यामध्ये आरोपी राजेंद्र फुलारी यांचा समावेश आहे. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदार यादी अद्ययावत करणे आणि मतदार मॅपिंगचे अत्यंत महत्त्वाचे काम चालू आहे. महानगरपालिका कर्मचारी असलेल्या राजेंद्र फुलारी यांची सन २०२३ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांनी १६ एप्रिल ते ११ मे २०२६ या काळात निवडणूक कामात मोठ्या प्रमाणावर विलंब, टाळाटाळ आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे.










