जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील कथित लाचखोरी, भ्रष्टाचार, दिरंगाई आणि मनमानी कारभाराविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला त्यांच्या हक्काची कामे करून घेण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. त्यामध्ये कार्यालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सर्व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करणे, नागरिकांसाठी आवश्यक माहितीचे फलक उभारणे तसेच प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घालू नये. दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल. दरम्यान, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कुंभार यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत श्रीगोंदा कार्यालयाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच संभाजी ब्रिगेडने सुचविलेल्या सकारात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयासाठी पूर्णवेळ उपअधीक्षकाची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अधिक शिस्त, पारदर्शकता आणि गती निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी भ्रष्टाचार, लाचखोरी आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला कदापिही थारा दिला जाणार नाही, अशी भूमिका मांडली. नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत संभाजी ब्रिगेडचा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.










