श्रीगोंदा | नगर सह्याद्री
आषाढी वारीनिमित्त संत शेख महंमद महाराजांची पारंपरिक पायी दिंडी श्रीगोंद्यातून विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात रवाना झाली. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या संत शेख महंमद महाराजांच्या या दिंडीत शेकडो वारकरी, महिला, युवक तसेच ज्येष्ठ भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. भगव्या पताका आणि दिंडीतील पांढरा ध्वज यामुळे सोहळ्याला वेगळेच आकर्षण लाभले.दिंडीच्या मार्गावरील विविध गावांमध्ये वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महाप्रसाद आणि इतर सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मार्ग भक्ती, सेवा आणि उत्साहाने भारावून गेला.
संत शेख महंमद महाराजांनी आपल्या कार्यातून समता, बंधूभाव, सर्वधर्मसमभाव आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणारी ही दिंडी दरवष पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. आषाढी वारीच्या या पवित्र परंपरेमुळे सामाजिक सलोखा, आध्यात्मिक एकात्मता आणि भक्तीची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांनी व्यक्त केली.










