मुंबई / नगर सह्याद्री :
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील इच्छुक नेत्यांची संख्या वाढलेली असतानाच शिंदे गटाकडून बाहेरील नेते बच्चू कडू यांना उमेदवारीची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बच्चू कडूंना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र शिवसेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. कडूंना उमेदवारी द्यायची असेल तर त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करावी, अशी अटही काही नेत्यांनी मांडली आहे.
राजकीय समीकरणांनुसार, बच्चू कडू शिवसेनेत दाखल झाल्यास विशेषतः विदर्भात पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीसह विदर्भ पट्ट्यात कडू यांचे मजबूत जाळे असून शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो. त्यामुळे हा निर्णय शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकतो.
सध्या विदर्भात भाजप आणि काँग्रेसचे वर्चस्व असताना शिवसेनेला तिथे बळकटी देण्यासाठी कडू यांचा पर्याय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या आक्रमक शैलीचा आणि जनसंपर्काचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, या संभाव्य निर्णयामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिंदे यांचा हा ‘सरप्राईज पॅकेज’ नेमका किती यशस्वी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी हवी असेल, तर प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करा
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. विधानपरिषदेच्या १० जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी राज्यातील विविध नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. परंतु शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी हवी असेल, तर प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करा, अशी मागणी शिवसेनेची असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.










