मुंबई / नगर सह्याद्री –
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता हळूहळू संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. या युद्धामुळे इंधन, गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम आता भाजी मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंटसह इतर व्यवसायांना देखील बसू लागला आहे. देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिक चिंतेत आले आहेत. या युद्धाचा फटका हळूहळू सर्वच गोष्टींना बसू लागला आहे. गॅस आणि पेट्रोलच्या टंचाईनंतर आता दारूचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे कॅन आणि काचेच्या बाटल्यांचा साठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच उरला आहे. मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम आता उद्योगांवर होत आहे. साठा संपल्यास उत्पादन थांबण्याची भीती असून दरमहा सुमारे २०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्यांचे टेन्शन वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर दारूचा देखील तुटवडा निर्माण होईल.










