श्रीगोंदा | नगर सह्याद्री
स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अवैधपणे नेली जाणारी ५ गोवंशीय जनावरे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात आली. या कारवाईत ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा तालुयात गस्त घालत असताना काष्टी ते श्रीगोंदा रस्त्याने एका पिकअप गाडीतून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी काष्टी रस्त्यावरील हॉटेल लोकसेवा समोर सापळा रचला.
काष्टीकडून येणारी संशयास्पद महिंद्रा पिकअप अडवून पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात ५ जिवंत गोवंशीय जनावरे आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी सोहम यशवंत टिळे (वय २१, रा. राहु, ता. दौंड) याला ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने आपले इतर साथीदार ओंकार दशरथ सायकर (रा. राहु), हिम्मत कुरेशी (रा. धाराशिव) आणि शोएब ताहेर कुरेशी (रा. आष्टी) यांच्या सांगण्यावरून ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली.
५ गोवंशीय जनावरे, महिंद्रा पिकअप गाडी, मोबाईल फोन असा मिळून ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (सुधारीत २०१५) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतर तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.










