पूर्णाकृती पुतळ्याजवळ प्रथमच जयंतीचा उत्साह
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस बँड पथकाकडून मानवंदना देण्यात आली. महामानवास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. ‘जय भीम’च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव, जल अभियंता परिमल निकम, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, नगरसेवक सुरेश बनसोडे, मयूर बांगरे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, उपायुक्त मेहेर लहारे, माजी नगरसेवक मनीष साठे, प्रा. माणिकराव विधाते, जयंत गायकवाड, वाल्मीक कुलकर्णी, प्रिया जानवे, रेश्माताई आठरे, सविता मोरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारे ठरले असून, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र अंगीकारून त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण केले पाहिजे. संविधानाच्या विचारांतून समाजाला दिशा मिळाल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच सर्वसामान्यांना हक्क मिळाले असून मी स्वतः महापौर पदापर्यंत पोहोचण्याचे श्रेय संविधानालाच देते.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कायदे व संविधान हे सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजासाठी कार्य करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या माध्यमातून हे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी दिलेला संदेश कृतीतून आणि साहित्याद्वारे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. जयंती मिरवणुका उत्साहात साजर्या कराव्यात, मात्र डीजे व लेझर लाईटचा वापर टाळून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले. तसेच पोलीस बँड पथकाच्या वतीने मानवंदना देत कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.
अभिवादन करण्यासाठी गर्दी
अहिल्यानगर शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून, या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील पुतळ्याच्या धर्तीवर उभारलेला हा पुतळा देशातील दुसरा असून शहरासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. पूर्णाकृती पुतळा उभारणीनंतरची ही पहिलीच जयंती असल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साह पाहिला मिळत आहे. महामानवास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. अबालवृद्धासंह, चिमुकले, महिला, सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकार्यांसह भीमसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘जय भीम’च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.

आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात पोलीस अलर्ट
अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अहिल्यानगर शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन कऱण्यात आले आहे. त्या निमित्ताने पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणवर तैनात कऱण्यात आला आहे. तसेच मिरवणूक मार्गावर बॉम्ब शोधक पथकाच्या वतीने कसून तपासणी केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर चौक येथे जनसागर लोटला आहे.










