ठाकरे सेनेचा विरोध ः किरण काळे | 50 हजार दुकाने, व्यावसायिकांना बसणार फटका
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
अहिल्यानगर महानगरपालिके कडून व्यवसाय परवाना शुल्कात तब्बल 160 टक्के वाढ करण्याचा महासभेच्या मंजुरीसाठी प्रशासना कडून सादर करण्यात आलेला प्रस्ताव अत्यंत अन्यायकारक असून दुकानदार, छोटे किरकोळ विक्रेते, व्यापारी विरोधी आणि जनविरोधी आहे. या प्रस्तावाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र जाहीर विरोध आहे. पाशवी बहुमतासह एकहाती सत्ता दिल्याचा हा दुष्परिणाम आहे. लोकशाहीमध्ये, नगर शहरात सक्षम विरोधी पक्ष असणे किती आवश्यक आहे, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
मनपा कडून व्यवसाय परवाना शुल्कात तब्बल 160 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाची धक्कादायक बाब उजेडात आल्यानंतर ठाकरे शिवसेनेने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात सुमारे 50 हजार लहानमोठी दुकाने व व्यावसायिक आस्थापना असून या प्रस्तावामुळे व्यापाऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. काळे म्हणाले, ही तर केवळ सुरुवात आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक घटकाला सत्ताधारी हे हकूमशाही निर्णय लादून उद्ध्वस्त करतील. राम मंदिरावर पडलेल्या दरोड्यावर मूग गिळून गप्प बसलेले तथाकथित ढोंगी हिंदुत्ववादी सगळ्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी एकीकडे जय श्रीरामचा नारा द्यायला लावत आहेत, तर दुसरीकडे स्वकष्टाने व्यापार, स्वयंरोजगारातून पोट भरणाऱ्यांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटत आहेत.
काळे पुढे म्हणाले, मतदारांनी सभागृहात चुकीच्या निर्णयांना विरोध करण्यासाठी विरोधी पक्षालाही पुरेसे प्रतिनिधित्व दिले असते, तर आज सत्ताधाऱ्यांना असे मनमानी निर्णय घेण्याचे धाडस झाले नसते. गल्ली ते दिल्ली सत्ता असून देखील महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. स्वतःच्या चुकीच्या आर्थिक नियोजनाची, निष्क्रिय कारभाराची आणि अपव्ययाची किंमत आता शहरातील सुमारे 50 हजार व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचा हा अघोरी प्रताप सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.
सत्ताधारी हे व्यापारी, व्यावसायिकांच्या मुळावर
सन 2023 मध्ये देखील हा प्रस्ताव महासभेकडून मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी आम्ही महापालिकेसमोर दोन दिवसांचे धरणे आंदोलन केले. प्रस्ताव पायदळी तुडवत निदर्शन केली. वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या भेटीगाठी घेऊन जनजागृती केली. आमच्यासह बहुतांशी संघटनांनी त्यावेळी या निर्णयाला विरोध केला होता. आम्ही जन आंदोलन उभं करत 2023 मध्ये तो डाव हाणून पाडला होता. पण नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत ज्यांनी निवडून देत सत्ताधाऱ्यांना पाशवी बहुमत दिलं तेच आता 50 हजार व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या मुळावर उठले आहेत. आम्ही कालही या घटकांच्या साठी लढलो. उद्याही लढू. चुकीच्या लोकांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या तर काय दुष्परिणाम होतात याचे आत्मपरीक्षण मतदारांनी देखील करण्याची गरज असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.












