अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदु समाजाने शुक्रवार सकाळी महापालिकेवर वराह पालन जनआक्रोश क्रांती मोर्चा काढला. यावेळी महापालिकेत ठिय्या आंदोलन करीत महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महापालिकेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनात हिंदुत्ववादी नेते सागर बेग, नगरसेवक कुमार वाकळे यांच्यासह हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महापालिकेने वराह आणि समाजातील वंचित घटकांवर केलेली कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि पर्यायी जागेची व्यवस्था न करता ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अनेक गरीब कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वराह पालन हा कैकाडी, वडार, शिकलकारी, कोचीकोरी, वाल्मिकी आणि वैदू यासारख्या भूमिहीन समुदायांसाठी ही एक फिरती बँक आहे. मुलांचे शिक्षण आणि आजारपणात कठीण काळात हाच व्यवसाय त्यांना आधार देतो. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हा पारंपारिक व्यवसाय उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
वराह पालकांवर केलेली अन्यायकारक कारवाई त्वरीत थांबवून ताब्यात घेतलेले वराह परत करावेत, शासनाने वराह प्रजनन व विकास धोरण तातडीने लागू करावे, वराह पालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्वतंत्र वराह विकास महामंडळ स्थापन करावे, या व्यवसायासाठी बँकामार्फत विना अट कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.










