पाथर्डी | नगर सह्याद्री
राज्यात उघडकीस आलेल्या भोंदूगिरी आणि बुवाबाजीच्या घटनांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुयात चालणार्या अनिष्ट प्रथा, जादूटोणा आणि लोकांची फसवणूक करणार्या भोंदू बाबांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रशासनाने या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करावा, या मागणीसाठी निवासी नायब तहसीलदार किशोर सानप, पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
दैवी शक्ती, चमत्कार, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली भोळ्या लोकांची आर्थिक फसवणूक करणे, त्यांचा मानसिक छळ करणे आणि महिलांचे शोषण करणे, हे गंभीर गुन्हे आहेत. ‘अशोक खरात’ सारखी भयंकर प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फलज्योतिष किंवा चमत्काराचा दावा करून जे लोक फसवणूक करत आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘जादूटोणा विरोधी कायद्यानुसार’ तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे.
हे निवेदन देताना अहिल्यानगर जिल्हा बुवाबाजी संघर्ष समितीचे कार्यवाह शशिकांत गायकवाड, पाथर्डी तालुकाध्यक्ष वसंतराव बोर्डे, उपाध्यक्ष राजेंद्र सातपुते यांच्यासह साईनाथ बोर्डे, सुभाष गायकवाड, श्रीधर दौंडे, सिद्धार्थ बोर्डे, पंढरीनाथ कांजवणे, भीमा थोरात आणि एम.डी. ढाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा भोंदू प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.










