नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पेपर लीक प्रकरण आणि जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
जोशी यांच्या जागी १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ राजस्थान कॅडरचे आयएएस (IAS) अधिकारी नरेश पाल गंगवार यांच्याकडे उच्च शिक्षण विभागाच्या नव्या सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे मोठे आव्हान आता गंगवार यांच्यासमोर असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून NEET आणि इतर परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात गदारोळ माजला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सह विविध विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी लावून धरली जात आहे. या वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रशासकीय स्तरावर ही मोठी कारवाई करत विनीत जोशींची पंचायती राज मंत्रालयात बदली केली आहे.
नवे सचिव नरेश पाल गंगवार हे आयआयटी दिल्ली आणि रुडकी विद्यापीठातून शिक्षण घेतलेले प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पर्यावरण तसेच पशुपालन आणि डेअरी मंत्रालयात सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आता देशातील ढेपाळलेली परीक्षा व्यवस्था रुळावर आणणे, विद्यार्थ्यांचा रोष शमवणे आणि शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणे हे मोठे आव्हान नव्या सचिवांसमोर असणार आहे.










