लोणी | नगर सह्याद्री
पावसाळ्यापूर्वीच ओढे, नाले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून चांगला वेग आला आहे. मागीलवर्षी पावसाळ्यात आलेले संकट विचारात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाला सक्त सूचना देऊन पाण्याचे प्रवाह सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने अनेक गावांना पुराच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. अनेक दिवस गावातील पाणी कमी न झाल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतजमीन, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐनवेळी पाण्याचे प्रवाह वळवून पुराचे संकट दूर करावे लागले होते.
झालेल्या नुकसानीची पाहणी करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना प्रामुख्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अतिक्रमणग्रस्त झाल्याचे निदर्शनास आले. ओढे, नाल्यांवर केलेली बांधकाम आणि प्रवाहच बुजवले गेल्याची कारण यानिमित्ताने पुढे आली होती.
मागील वर्षी पावसाळ्यात आलेल्या संकटाचा सामना यंदा पुन्हा करावा लागू नये म्हणून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही मोहीम आपल्या मतदार संघातून सुरू केली आहे. जलसंपदा विभागातील सर्व अभियंत्यांना गावात पाठवून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन ओढे, नाले अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेण्याच्या दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे प्रवरा डाव्या, उजव्या कालव्यावरील अतिक्रमण वेगाने काढणे सुरू झाले आहे.
सद्य परिस्थितीत जलसंपदा विभागाने तिसगाव, उकलगाव योजना, पाथरे चारी योजना, राजूरी ममदापूर, नांदूर, खंडाळा योजना, राहाता साकुरी चर योजना, चोळकेवाडी तसेच लोणी, हसनापूर हनुमंतगाव, दाढ, कोल्हार, राजूरी ते रानशेंडा, कुरणपूर, उक्कलगाव ओढा या योजनावरील सर्व अतिक्रमण काढून विभागाने पावसाळ्यापूर्वीच नैसर्गिक स्त्रोत पूर्ववत करण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक गावांना मागील पावसाळ्यात महापुराचा सहन करावा लागलेला धोका विचारात घेऊन ग्रामस्थ सुध्दा अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सहकार्य करीत आहेत.










