भक्तिरसात न्हाऊन निघणार श्रीगोंदा
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे यंदा 15 जुलै रोजी सकाळी 8 वाजता श्रीगोंद्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. शांतता, सामाजिक सलोखा आणि विठ्ठल भक्तीचा संदेश देणाऱ्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष असून, हजारो वारकऱ्यांच्या सहभागामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
पालखी सोहळ्यात यंदा सुमारे तीन हजारांहून अधिक वारकरी व भाविक सहभागी होणार असून, संपूर्ण मार्गावर नामस्मरण, हरिपाठ आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला खांदा देणारी सुप्रसिद्ध बैलजोडी या सोहळ्यातही सहभागी होणार आहे. या बैलजोडीचे मानकरी म्हणून कृषी अधिकारी संदीप बोदगे यांना सलग चौथ्यावष हा मान मिळाला आहे.
पालखीचा मार्ग शेडगाव, खेड, भिगवण, पळसदेव, इंदापूर, बावडा, खंडाळी आणि तोंडले या गावांमधून पंढरपूरकडे जाणार आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी निवास, भोजन आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्याचा विचार करून प्रशस्त मंगल कार्यालयांमध्ये मुक्कामाची सोय करण्यात आली असून, पंढरपूर येथेही भाविकांसाठी निवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर संत शेख महंमद महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची होणारी पवित्र भेट हा सोहळ्याचा मुख्य आध्यात्मिक क्षण ठरणार आहे. हा दुर्मिळ आणि भावस्पश सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पालखी सोहळा समितीने राज्यभरातील भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करत भक्ती, समता आणि बंधूभावाचा संदेश अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले आहे.










