शिवरस्ता मोजणी प्रकरणात बेकायदेशीर कारवाई झाल्याचा आरोप
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
नवीन जोशीवस्ती व जंगलेवाडी येथील शिवरस्ता मोजणी प्रकरणात बेकायदेशीर कारवाई झाल्याचा आरोप करत तसेच शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांचे उल्लंघन व संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शेतकरी करीम जहांगीर शेख यांनी 1 जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू होते.
उपोषणाच्या फलकावर नमूद केल्यानुसार, शिव रस्ता मोजणी प्रक्रियेत नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा भंग झाला असून शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांवर गदा आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची विभागीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणकर्ते करीम शेख व इतर शेतकरी यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनामुळे संबंधित प्रकरणाकडे महसूल व भूमी अभिलेख विभागाचे लक्ष वेधले गेले असून प्रशासनाकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. उपोषणस्थळी शेतकरी व ग्रामस्थांकडून भेटी देऊन पाठिंबा व्यक्त केला जात आहे.दरम्यान, उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होतो का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.










