पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, वाघवाडी, भनगडेवाडी आणि धोत्रे परिसराला निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते सुजित झावरे पाटील यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
आता केवळ पंचनामे नकोत, तर शेतकर्यांना प्रत्यक्षात आर्थिक मदत द्या, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या नैसर्गिक आपत्तीत कलिंगड, वाटाणा, कांदा, डाळिंब, झेंडू, गहू, आंबा, संत्री या फळबागांसह चारा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके जमिनीदोस्त झाली असून शेतकर्यांचे लाखो रुपयांचे भांडवल मातीत गेले आहे. झावरे पाटील यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करताना शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कृषी आणि महसूल विभागाने तातडीने संयुक्त पंचनामे पूर्ण करून शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी, यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच बबनराव पवार, सुधाकर गावडे, बाबाजी चौधरी, नाना चौधरी, बाळू देशमुख, सोनाजी देशमुख, अण्णा वाघ, शिवाजी खोडदे, संदीप वाळुंज, किरण वाळुंज, संदीप वाळुंज, विश्वनाथ वाघ, निलेश चौधरी, भिकाजी वाघ, किसन वाघ, जयसिंग वाघ, संदीप चौधरी, बबन नरसाळे, विलास वाघ, कैलास शिंदे, अशोक कुटे, भाऊ नरसाळे, सुनिल थोरात, नवनाथ वाघ, नागेश शेळके, रामा देशमुख, ऋषिकेश वाघ, शेरीबा देशमुख यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने विलंब न लावता मदत कार्यास सुरुवात करावी, अन्यथा तीव्र पाऊल उचलले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
नुकसान भरपाईसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
ढवळपुरी परिसरातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा संकटात आहे. केवळ पंचनाम्यांचे सोपस्कार पार पाडून चालणार नाही, तर प्रशासनाने तातडीने अहवाल सादर करून सरसकट नुकसान भरपाई द्यायला हवी. मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. शासनाने शेतकर्यांना वार्यावर सोडू नये, हीच आमची प्रमुख मागणी आहे.
– सुजित झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद)










