दूध संघाचा विजेवरील खर्च कमी होणार : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर | नगर सह्याद्री
दूध हे महत्त्वाचे अन्न आहे. दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता जपल्याने राजहंसचे राज्यभरात मोठे नाव आहे. दूध संघाचा विजेवरील होणारा खर्च टाळण्यासाठी राजहंस दूध संघाने टाटा कंपनीच्या समन्वयातून उभारलेला सौर ऊर्जा प्रकल्प कौतुकास्पद असून, दररोज 1350 किलोवॅट वीज निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन दूध संघाचे मार्गदर्शक तथा राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, लक्ष्मणराव कुटे, आर.बी राहणे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, ॲड नानासाहेब शिंदे, दूध संघाचे संचालक विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, रवींद्र रोहम, प्रतिभाताई सोमनाथ जोंधळे, मंदाताई गोरख नवले, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, कन्सल्टंट विनीत शहा, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, सौर ऊर्जा प्रकल्पाचे हर्षल सातव, सिद्धार्थ थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आ.सत्यजित तांबे म्हणाले की, दूध संघाने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला असून पुढील अडीच वर्षांमध्ये या प्रकल्पाचा खर्च वसूल होणार आहे. विजेवरील खर्चात मोठी बचत होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प प्रत्येकाने करावा, असा हा उपक्रम असून या प्रकल्पाबाबत सरकारची काही चुकीचे धोरण आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल.
चेअरमन रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, सुमारे अडीच एकर परिसरामध्ये उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दररोज 1350 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यातून दररोज 5220 युनिट वीज निर्मिती होणार असून महिन्याला दीड लाख युनिट वीज तयार होईल. पुढील तीन वर्षांमध्ये प्रकल्पाचा पूर्ण खर्च पूर्ण होऊन 100 टक्के मोफत वीज दूध संघाला मिळणार आहे. त्यातून मोठी बचत होणार आहे. सर्व मंजुरीसह तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला असल्याचे सांगताना आगामी काळात दूध शुद्धतेवर अधिक भर द्यावा लागणार असून गाव पातळीवर सोसायटी यांनी गाय गोठा ते संघ प्रक्रिया पर्यंत दुधाची काळजी घ्यावी. दूध संघाने 4 लाख लिटरपर्यंतचा टप्पा पार केला असून आगामी काळात दूध संकलन वाढवण्यासाठी काम करावे.
यावेळी दूध कन्सल्टंट विनीत शहा यांनी गाय गोठा, सोसायटी यामधील स्वच्छता व विविध उपाययोजनांबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी रावसाहेब दुबे, विजय राहणे, बाबासाहेब गायकर, विलास शिंदे, रोशन गोपने, समीर शिंदे, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी यांनी केले तर व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले. यावेळी दूध उत्पादक व दूध सेवा सोसायटी यांचे चेअरमन, सेक्रेटरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










