चौघांविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शेतात उसाचे पाचट पेटवल्याने लागलेल्या आगीत दोन पत्र्याचे शेड जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत सात लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी सागर अशोक घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारुळाचा मारुती परिसरातील कल्याण बाबा गृहनिर्माण संस्थेच्या पाठीमागील भागात सागर घोलप व भागीरथ बोडखे यांचे पत्र्याचे शेड आहे. पाच मार्च रोजी सकाळी सात ते आठच्या सुमारास अमर वाघ, अनिल वाघ, सचिन वाघ आणि सागर वाघ (सर्व रा. नालेगाव) यांनी शेतात उसाचे पाचट कोणतीही पूर्वसूचना न देता निष्काळजीपणे पेटवून दिले. यामुळे पसरलेल्या आगीने घोलप व बोडखे यांच्या शेडमधील साहित्याचा वेढा घेतला.
आगीत सजावट साहित्य, चपाती बनवण्याचे यंत्र, तसेच अन्य संसारोपयोगी वस्तूंनी पेट घेतल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्नीशमन दलाच्या साहाय्याने आग विझवण्यात आली, परंतु तोपर्यंत सर्व साहित्य जळून राख झाले होते. घटनेनंतर फिर्यादी सागर घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वरील चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.










