पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरातून जाणाऱ्या पारनेर-सुपा राज्य मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सततच्या पावसामुळे रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली होती. या समस्येबाबत नगर सह्याद्रीने सातत्याने वृत्तांकन केल्यानंतर तसेच नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
पारनेर शहरातील बसस्थानक परिसरापासून सय्यद हॉस्पिटलपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत होता. अनेक किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.
पारनेर हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पहिल्याच पावसात रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनचालक समोरून येणाऱ्या वाहनांच्या मार्गात जात असल्याने अपघातांचा धोका वाढला होता.
यशवंत हॉटेल परिसर, बँक ऑफ बडोदा समोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वार, हनुमान मंदिर परिसर, डॉ. सय्यद हॉस्पिटल परिसर, पारनेर ग्रामीण पतसंस्था समोरील रस्ता तसेच ए.डी.सी.सी. बँक चौक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्त्यावर खडी पसरल्याने अपघाताच्या घटना घडत होत्या. त्यामुळे हे भाग नागरिकांच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागले होते.वृद्ध नागरिक, महिला, शालेय विद्याथ आणि पादचारी यांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विविध संघटना आणि नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. सध्या अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असून येत्या काही दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार व टिकाऊ रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.










