कोल्हापूर / नगर सह्याद्री –
बीडमधील मस्साजोग प्रकरणाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुनरावृत्ती झाली का अशी भीती व्यक्त केली जाते. कारण पाटगावचे माजी सरपंच गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मात्र त्यांचा अजून कोणताही मागमूस लागत नाही. पोलिसांना देखील तपासात अद्याप कोणतंच यश आलं नाही. त्यामुळे संबधित माजी सरपंचांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. दोन महिन्यांपासून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, मात्र अजून पिळणकर यांचे काय झाले हे समोर आलं नाही.
काही दिवसांपूर्वी पाटगाव भागात जळालेल्या अवस्थेत काही हाडं सापडली होती. मात्र त्याचा अहवाल येणं अजूनही बाकी आहे. ती हाडं एखाद्या जनावरांची असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी महेश पिळणकर यांच्याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान करावा असी विनंती त्यांनी केली आहे.
बीडच्या मस्साजोग प्रकरणात पोलिसांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं होतं. मात्र कोल्हापूरच्या या प्रकरणात पोलीस कोणतीही माहिती देत नाहीत. आम्ही पोलिसांना सर्व मदत केली आहे, मात्र तपासात काहीच प्रगती नाही. त्यामुळं मस्साजोगपेक्षाही पुढं गेलेलं हे प्रकरण असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सतिशचंद्र कांबळे यांनी म्हटलं आहे.
महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर पोलीस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिलं. पोलिसांनी देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी पिळणकर यांच्या कुटुंबाला दिलं.
महेश पिळणकर हे लोकप्रिय सरपंच होते. पाटगाव भागात त्यांची जोरदार चर्चा असायची. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीची ती तयारी करत होते. त्यामुळं राजकीय आणि इतर सर्वच बाजुंनी तपास केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र जोपर्यंत पिळणकर यांचा ठावठिकाणा लागत नाही तोपर्यंत शंकेची पाल चुकचुकत राहणार.










