- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार; नागरिकांशी थेट संवाद, दिले हे आश्वासन

नागरिकांच्या अर्जांचा स्वीकार, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर शहरात जनता दरबार घेऊन नागरिकांच्या विविध समस्या व मागण्यांबाबतचे अर्ज स्वीकारले. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ते नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहिले असून जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या अडचणी, सूचना आणि निवेदने त्यांच्या समोर मांडली.

विळद घाट येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या जनता दरबाराला जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. अनेक नागरिकांनी आपल्या प्रश्नांबाबत लेखी अर्ज सादर केले. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक अर्ज काळजीपूर्वक ऐकून घेत संबंधित विषयांबाबत योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.

प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच नगरमध्ये आगमन झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले तसेच घोषणाबाजी करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत संकेत दिले. १० ते १२ मार्च दरम्यान राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. बंगाल, तमिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आसाम या राज्यांतील निवडणुकांसोबत महाराष्ट्रातील बारामती व राहुरी या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील भाजप संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, संघटनेत दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणे आणि त्यांना योग्य स्थान मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून आगामी काळात संघटनात्मक काम अधिक गतिमान करण्यावर भर दिला जाईल.

हे सुद्धा वाचा :  सुप्यात शिवाई उलटून प्रवासी जखमी, काय घडले पहा

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मनापासून आभार मानले. सर्वांच्या विश्वासामुळेच ही जबाबदारी मिळाली असून त्याबद्दल आपण सर्वांचे ऋणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ