श्रीगोंदा | नगर सह्याद्री
अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. तडजोडीनंतर ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नितीन अशोक घाडगे, राजेश रावसाहेब जाधव तसेच शासकीय वाहनचालक दादाराम शिवराम म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या भावाचा ५ जून रोजी अपघात झाला होता. उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. या अपघाताची नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता.
त्यानंतर संबंधित कर्मचार्यांनी अपघाताची माहिती आरसीसी अॅपमध्ये भरणे व गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतःसह इतरांसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने १४ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. संबंधित कर्मचार्यांनी लाचेची रक्कम १० हजारांवरून ७ हजार रुपयांपर्यंत कमी करण्यास सहमती दर्शवली. तक्रारदाराला वाहनचालक दादाराम म्हस्के यांच्याकडे पाठविण्यात आले. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारातच ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.










