पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसासाठीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वासुंदे, शिक्री, बोकणकवाडी, वडगाव सावताळ, पळशी, नागापूरवाडी आणि खडकवाडी या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, हा पाऊस पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त (पेरणीयोग्य) ठरल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, रविवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तास-दीड तास चाललेल्या या जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे-नाल्यांना पाणी आले.
ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू केली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तालुक्यात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही पावसाची चातकासारखी वाट पाहत होतो. कडक ऊन आणि उष्णतेमुळे जमिनी सुकल्या होत्या, त्यामुळे पेरण्या कशा होणार, अशी चिंता सतावत होती. पण रविवारच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. आमच्या परिसरातील गावांमध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यामुळे आम्ही आता खरीप पेरणीच्या तयारीला लागलो आहोत. या पावसाने पिकांना संजीवनी दिली आहे, अशी प्रतिक्रिया पळशी येथील शेतकरी लहू मधे यांनी दिली.
ठराविक भागातच हजेरी
दरम्यान, हा पाऊस संपूर्ण तालुक्यात सारखा झालेला नाही. तालुक्याच्या उत्तर भागातील ठराविक गावांमध्येच पावसाने हजेरी लावली, तर उर्वरित भागात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.










