शेवटी सत्याचाच विजय; आदिवासींच्या लढ्याला यश : लहू मधे
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील ढवळपुरी येथे आदिवासींच्या मालकीच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामांवर लवकरच शासनाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असून, संबंधित जमीन मूळ आदिवासी मालकांच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या घडामोडींमुळे परिसरातील आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष लहू मधे यांनी सांगितले की, शेवटी सत्याचाच विजय झाला. आदिवासींची जमीन बळकावून त्यावर मुनींद्र धर्मार्थ ट्रस्टच्या सतलोक आश्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे बांधकाम करण्यात आले होते. ही जमीन आदिवासींची असल्याचे सिद्ध करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
मधे यांनी आरोप केला की, या प्रकरणात काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे न्याय मिळण्यास विलंब झाला. अखेर आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी पारनेर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली.
त्यानंतर पारनेर तहसीलदारांनी भूमी अभिलेख विभागाला संबंधित जमिनीची मोजणी करून ती मूळ आदिवासी मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. या निर्णयानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जमिनीची अधिकृत मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यावरील कथित बेकायदेशीर बांधकामांवर शासनाकडून नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.










